Saturday 7 April 2012

Marathi kavita : पाऊस आता निनादणार नाही !

खरं म्हणजे ते कधीही
अचानकच
ठरलं असतं.
ग्रेसचे हे असं न रिमझिमता
बंद पडणं !

काही गोष्टी
शाश्वत आहेत
असच आपण गृहीत धरलेलं असतं.
जसं लता मंगेशकरच
गाणं...
कोजागिरीचा चंद्र....
अंगावर येणारा आणि अनावर !
आईचं आपल्या
सगळ्या चुका
मुकाट पोटात घेणं
आणि वडीलांच
तेव्हढ्यापुरतं रागावण..
हे
सगळं गृहीतच नसतं का ?

तसेच होते ग्रेसचे
कुठेतरी कागदावर गुणगुणत
असणे,
जगणं दिवसेंदिवस शुष्क होत जाताना
ह्याचे शब्द अधिक आर्द होत
जाणं
वनांची वाळवंटे फुलत जाताना
ह्याची बाग मात्र दहीवरत राहणं,
हृदयांचे
जीवाश्म बनत असताना
ह्याचे मात्र सतत गहिवरत जाणे,
हे किती सरळपणे

शाश्वत मानू लागलो होतो आपण,
किती गृहीतच बनले होते हे स्वप्न !

अन
त्याच्या जाण्याची बातमी,
पाऊस अचानक थांबावा तशी !
सगळं भावविश्वच
डीमिमिस्टीफाय करणारी !

आता खरचं पाऊस थांबलाय,
कदाचीत तो नंतर सुरूही
होईल,
त्याच्या आठवणीमुळे संततधार.

पण आता पाऊस
निनादणार नाही......
हे मात्र नक्की !

         -श्रीनिवास बेलसरे

No comments:

Post a Comment